खास पोस्ट

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jagtik Mahila Dinachya Hardik Shubhechchha! International Women's Day

आज जागतिक महिला दिन! स्त्री वेगवेगळ्या (शारीरिक-मानसिक) अवस्था सोसून (देखील),  कधी त्याचे भांडवल न करता, ज्या-ज्या विविध अशा भूमिका ठरवून दिलेल्या असतात,  किंवा  ज्या-ज्या विविध अशा भूमिका वाट्याला आलेल्या असतात,  त्या अगदी (यशस्वीपणे) पार पाडीत असते, त्यालाच एक दुजोरा (म्हणून की काय!) 8 मार्च हा आजचा दिवस, जागतिक 'महिला दिन'! यामध्येच एखाद्या स्त्री च्या भूमिकेतील गमक दिसून येते! स्त्रीच्या अंगी निसर्गतःच मातृत्व आहे, माया आहे, ममता आहे! संगोपन हा गुण देखील तिच्या अंगी निसर्गतः च आहे. बहुतांशी (अख्खे कुटुंबच) एखाद्या आई/बहीण/सुनेच्या भोवताली, या ना त्या कारणाने फिरत असलेले आपण बहुतांशी पाहिलेले आहे. तिच्या शिवाय काही गोष्टी घरात, कधी कधी (आणि वेळेला!), सापडूच शकत नाहीत!😊 (हा अनेकांचा अनुभव आहे!)  कुठलीही (आई, बहीण, सून अशा) स्वरूपातील 'स्त्री', घरात नसेल तर घराला घरपण नसते. स्त्री कोमल असली तरी खंबीर असते! वेळोवेळी कणखर झालेली  तिला  जगाने पाहिलेले आहे! त्यामुळे, तिचे महत्व जाणून घेणे, लक्षात ठेवणे, आणि वेळोवेळी, तिच्या जगण्याला, आणि जपण्या...

हारल्या नंतर खरंच सारे जग संपते का ?

एखाद्या मोठया अपयशानंतर जगणे असह्य होते ; पण हारल्या नंतर खरंच सारे जग संपते का ? नाही … , जगावेच लागते , कितीही निराश झाले , कितीही गाऱ्हाणे केले , कितीही रडले - पडले, कितीही कणले - कुतले तरी जीवन जगावेच लागते. … अन जीवन (आपण ) संपविले तर ते संपते का ? नाही … ते परत उभारी घेते कोण्या दुसऱ्या विश्वात , कोण्या दुसऱ्या रुपात! पण चेतना आपलीच असते आणि आपल्यालाच साहावे लागते... तेच जे आपण इथे सोडले होते ते !
मान्य आहे… जिंकणारा नशीबवान असतो . … पण कधी विचार केलाय ? … हारणारा त्याच्यापेक्षाही जास्त नशीबवान असतो ! कारणही तसेच आहे … , जिंकणाऱ्या साठी एक विशिष्ट द्वार खुले असते ; परंतु हरणाऱ्याला हरल्यानंतर आधीच उघडे असलेले जग उपलब्ध असतं . प्रवेश दोघांनाही खुला आहे , फरक मात्र एवढाच आहे कि जिंकणाऱ्या समोरचे प्रवेशद्वार हे दृश्य म्हणजेच दिसणारे असते आणि हरणाऱ्या व्यक्ती समोरचे अनेक प्रवेशद्वार हे अदृश्य म्हणजे न दिसणारे असतात, किंबहुना, खुल्या जगाला कधी प्रवेश द्वार पाहिलेय का ? हि गोष्ट अपयश आलेल्या अथवा हरणाऱ्याला माहीतच नसते , तो आपला निराश , उदास आणि खिन्न होऊनच बसलेला असतो . परंतु असे खिन्न , उदास आणि निराश होणे , कुठलाही फरक न पाहता , कुठल्याही बाबी न तपासता , कुठलेही इतर पर्याय , इतर मार्ग न पाहता कितपत योग्य आहे ?
जिंकणारा नशीबवान असतो कारण त्याला जी संधी पाहिजे असते मिळालेली असते , त्याला ज्या मालकाच्या अथवा ज्या गोष्टीच्या अधिपत्याखाली काम करायचे असते ते भेटलेले असते , त्याला ज्या पद्धतीने काम करायचे असते ती पध्दत मिळालेली असते . परंतु न जिंकणाऱ्या ला काय काहीच भेटत नसते काय ? उलट जिंकणारच जास्त नशीबवान असतो ; कारण त्याच्यासमोर हुकलेली संधी वगळता इतर संध्या प्रचंड उपलब्ध असतात (दुर्दैव फक्त एवढेच आहे कि , हरणारा माणूस फक्त हुकलेल्या संधीकडेच बघत बसतो !) . तो कोणतेही आधिपत्य (मालकी) , कोणतीही विशिष्ट पद्धत (कधी कधी या सार्या बाबी ) नाकारू शकतो आणि स्वतः च्या अधिपत्याखाली , स्वतः च्या पद्धतीने , स्वतः च्या मनाने , कधी कधी अगदी स्वैर , बिनबोभाट कुठल्याही दडपणाशिवाय आणि अगदी स्वतंत्र पणे कार्य करू शकतो .
जिंकणारा यशस्वी असू शकतो , त्याला ज्याच्यासाठी जिंकलाय तेच काम करायचे असते ;परंतु हारणाऱ्या पुढे इतर कामे प्रचंड प्रमाणात पूर्ण करण्यासाठी उभे असतात आणि चौफेर संध्या निवडण्यासाठी उपलब्ध असतात . या सर्वांमध्ये सर्वांत मोठे काम म्हणजे एक चांगला व्यक्ती बनणे आणि एक चांगले व्यक्तिमत्व कमावणे हेसुद्धा असू शकते!
हार जीत आयुष्यामध्ये चालूच असते ! कोण सदा सर्वदा जिंकलाय ? अन कोण सदा सर्वदा हरलाय ? कोणी डाव जिंकतो , कोणी पैसा जिंकतो , कोणी कोणाचे मन जिंकतो तर कोणी विश्वास जिंकतो , कोणी इतरांचे प्रेम जिंकतो , कोणी नुसताच विनर घोषित केल्या जातो आणि बक्षिसाची वाट बघत बसतो . अगदी याचप्रमाणे कोणी परीक्षेचा निकाल हारतो , कोणी भान हरवतो , कोणी शुद्ध हरपतो , कोणी युद्ध हरतो तर कोणी कोणाजवळ आपले हृदयच हरवून बसतं ! … असे हे हरण्याचे प्रकार !
मन हरवण्या सारखा सुखद अपवाद सोडला तर इतर हारण्यामुळे त्रासच अधिक होतो . परीक्षेत नापास झालो - खिन्न ! कुठे नंबर नाही लागला - त्रास ! कुठे नोकरी नाही लागली - परेशानी ! कोणाला प्रेम नाही भेटले - खच्चीकरण , कोणी पैसे नाही दिले - संताप ! … वगैरे वगैरे .
परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही , आपण स्वतः म्हणत असतो कि 'मी हारलो ' म्हणूनच आपण हरलेलो असतो ; म्हणजे आपण स्वतः च स्वीकारलेले असते कि 'मी हरलो ' म्हणूनच उर्वरित मन : स्ताप आपल्या नशिबी येतो . आपण स्वतः च नाही स्वीकारले तर ? आणि आपण स्वतः च स्वतः ला 'हरलो ' असे नाही म्हटले तर ? तर मग आणखी काम , आणखी प्रयत्न , आणखी मेहनत करावीशी वाटेल आणि त्या मेहनतीसाठी जर ईश्वराजवळ काही मागायची पाळी आली तर ? निश्चितच मग कुठलाही व्यक्ती 'फक्त लढण्याचे बळ दे ' असेच मागेन ! असे आहे . जो हरलेला असतो तो काढूनच हरलेला असतो आणि ज्याने हार मानलेली असते, त्याने कुठलीही लढाई वगैरे केलेली नसते . त्याने अगोदरच हार मानलेली असते . दोहोंमध्ये लढाई करून हरलेला 'किमान मी लढलो तरी !' या समाधानाने स्वस्थ असतो . त्यामुळेच …
हारणे आणि हार मानणे , दोहोंमध्ये फरक आहे … एका लढाईचा !
खुल्या जगातील मोकळी हवा (स्वांतत्र्य ) कधी अनुभवलेय ? खुप मज्जा , आनंद आणि समाधान वाटते ! हां खुल्या आणि मोकळ्या जगामध्ये धोकाही तितकाच असतो म्हणा , परंतु आपले अस्तित्व काही एकदमच नष्ट नाही होणार ! काही तरी शिल्लक राहिलच कि ! पुनः हालचाल करायला ! … आणि जरी झालेच , तर कोण आलंय या जगात शाश्वत टिकायला ? धोक्याची पातळी तरी मोजता येईल न ! … अन सोबतच मुक्त स्वातंत्र्याची चव चाखता येईल त्याचे काय ? बंद खोली मध्ये काय आहे ?
रस्त्यावरची ट्रॅफिक बघितलीये कधी ? कशी रांगेमध्येच चाललेली असते , आणि तेही विशिष्ट साईड नेच ! आवश्यकतेनुसार स्पीड कमी जास्त करणारी , मध्ये मध्येच ब्रेक मारणारी ! याच तुलनेत आकाशातील विमाने बघितलीत कधी ? नो ट्रॅफिक , नो रांग . … हा एक विशिष्ट मार्ग असेल कदाचित त्यांचा ; परंतु एकच स्पीड , मर्यादित ब्रेक .
त्याही उप्पर , अंतराळातले रॉकेट बघितलेय कधी ? वन मॅन शो ! एकटाच , (गावाकडच्या भाषेत बोलायचे झाले तर ) कोणाची हाइक नको दईक नको , म्हणजे कोणाचाही डिस्टर्ब नाही , कुठलाही अडथळा नाही , संथ , शांत आणि जसा काही मनमुराद विहार करतोय असा !
त्यामुळे हारल्यानंतरहि (संपूर्ण ) जग (जसे काही केवळ आपल्यासाठीच ) अस्तित्वात असते , नाही ते उपलब्ध असते , गरज असते ती आपली मरगळ झटकण्याची आणि (आलेल्या अपयशा च्या दिशेने केलेली नजर आणि मान ) वळविण्याची आणि पाहण्याची कि , किती (न उचललेल्या , न निवडलेल्या आणि दुर्लक्षित ) संध्या आपल्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत आहेत ते ! गरज आहे ती झोकून देण्याची आणि झेप घेण्याची (अर्थात पंखां निशी ) खुल्या सागर आणि आसमंतात , मुक्त आणि मनसोक्त विहार करण्यासाठी !